Friday, February 6, 2009

मराठ्यांना आरक्षण ही काळाची गरज

मराठा जातीच्या इतिहासाला जवळजवळ 2 हजार वर्षांपूर्वीच्या काळापासून ऐतिहासिक संदर्भ मिळतात. इ.स. पूर्वकाळातील मौर्य वंशापासून नंतरच्या सातवाहन, क्षत्रप तसेच अलिकडच्या चालुक्य आणि यादव वंशाच्या राजापर्यंत या मराठा जातीचे वर्चस्व दिसून येते. तेराव्या शतकाच्या अखेरीस यादव सत्तेचा पाडाव केल्यानंतर ते थेट सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेपर्यंत मुस्लिमांनी राज्य केले. त्यानंतर पुन्हा जवळजवळ 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केले. या काळात राज्यकर्त्यांनी जातीभेदाचेच राजकारण करून राज्य केले. इंग्रज तर जाता-जाता आमच्यामध्ये जाती-जातीत भांडणे लावून गेले. भारताला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली. तरीही जाती-पातींचे राजकारण आजही सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला न्याय मिळावा म्हणून घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्या आरक्षणाचे राजकारण करून आजमितीस प्रत्येक राजकीय नेता सत्तेची फळं उपभोगत असताना ज्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली ते गोरगरीब मात्र आजही दारिद्रयांमध्ये खितपत पडले आहेत. सांगायचा मुद्दा हाच की, ज्याला शक्य झाले त्याने आपली प्रगती साधली. परंतु बाकीचा समाज मात्र कायम उपेक्षितच राहिला. हीच परिस्थिती आज मराठा समाजाचीही आहे.
स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवणारी, स्वामीनिष्ठ, दिलेल्या शब्दाला जागणारी, मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण हटणार नाही, अशी बिरुदावली बाळगणारी जात म्हणजे मराठा. ब्रिटीशांची सत्ता येईपर्यंत जवळजवळ 150 वर्षे मराठ्यांनी महाराष्ट्रात राज्य केले. मोगल काळात आणि पुढे इंग्रज काळातही या मराठा समाजातील काही मंडळींनी आपला दबदबा कायम ठेवला होता. तेव्हा शिपाई, मावळा, मराठा, पाटील, देशमुख, सरदार हे मराठा म्हणून गणले जात. त्यातूनच पुढे व्यवसायावरून जाती पडल्या. शेती कसणाऱ्यांच्या काही भागात कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, तिलोरी कुणबी अशा विविध पोटजाती तयार झाल्या. सांपत्तीक स्थिती आणि सामाजिक दर्जा यानुसार अनेक स्तर तयार झाले. ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर मुलुखगिरी गेली. इनामे खालसा झाली. सरंजामशाही, राजेशाही संपल्याने मराठा जातीतील ज्या मूठभर लोकांकडे शेतजमीन, संपत्ती, सामाजिक स्थान वंश परंपरेने चालत आले होते असा वर्ग अधिक पुढारला गेला. मात्र तळागाळातील बहुसंख्य मराठा समाज हा अधिकच मागासला. या आपल्याच मागासलेल्या समाजाला विविध आमिषे दाखवून मुठभर उच्चभू्र मराठ्यांनी कधी पैसा दाखवून तर कधी सामाजिक भांडवल करून उच्च स्थाने पटकावली. राजकारणात मुसंडी मारली. परंतु या मंडळींनी आपल्या समाजाकडे विशेष लक्ष न दिल्याने बहुसंख्य मराठा समाजाची अवस्था आजही दयनीयच आहे. प्रत्येक वेळी मराठा म्हटल्यावर या मूठभर लोकांचीच उदाहरणे दिली जातात. परंतु प्रत्यक्षात शेतीवर अवलंबून असलेली अनेक मराठा कुटुंबे गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून अल्पभूधारक तसेच काही भूमीहीन झाले आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक मराठा आहेत. रोजगार हमी योजना, शेजमजुरी, माथाडी तसेच इतर ठिकाणी मजुरी करणाऱ्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक लोक हे मराठा जातीचे आहेत. शैक्षणिकदृष्ट्या ही मराठा जात खूपच मागासलेली आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार तळागाळापर्यंत करणारी मंडळी मराठा समाजातील असूनही शिक्षणाच्या अभावामुळे नोकरीतील प्रमाण फक्त अडीच ते तीन टक्के आहे. ही जात खुल्या वर्गात मोडत असल्याने शिक्षणाकरीता प्रवेश अगदी शाळेपासून, इंजिनियरींग, आय.टी., मेडीकल, आयआयएमपर्यंत आणि नोकऱ्यांपासून पदोन्नतीसाठीही प्रखर स्पर्धेस तोंड द्यावे लागत आहे. आज मराठा समाज व्यसन, राजकारण आणि खोट्या प्रतिष्ठेच्या विळख्यात सापडला आहे. मराठा समाजात खोट्या प्रतिष्ठेचा पीळ कायम आहे. मद्यपान करणे म्हणजे मर्दुमकी असा मराठा समाजातील पुरुषांचा समज आहे. त्यामुळे श्रीमंत असो वा गरीब बहुतेकजण दारूच्या आणि इतर व्यसनांच्या आहारी गेलेले. एवढे करून सवरून घरी गेल्यानंतर पत्नीला, पोरांना मारहाण, शिव्या, शेजाऱ्यांशी भांडणे हे ठरलेले आहे. काही मराठ्यांना राजकारणाची मोठी हौस. या हौसेपायी काही आमिषे दाखवणाऱ्यां नेत्यांच्या पाठी हे सतत फिरत असतात. नेत्यांच्या नादी लागून अनेकवेळा इतरांशी संघर्ष करतात. तोडफोड, हाणामाऱ्या, दमबाजी अशा प्रकारातून हे तरूण अंगावर पोलीस केसेस ओढवून घेतात. एकदा पोलीस केस झाली की, पुढचे संपूर्ण आयुष्य बरबाद होते. त्यावेळी यांचे नेते इतरांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यात दंग असतात. यांचा वाली कोणीच नसतो. वारंवार धक्के बसूनही हा मराठा सुधारायला तयार नाही, याला जबाबदार कोण?
आज अनेक मराठा नेत्यांना शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज बऱ्याच शिक्षणसंस्था बहरलेल्या दिसतात. परंतु तेथे फक्त पैशाची भाषा चालते, हीच खरी शोकांतिका आहे.
राजकीय पटलावरील सद्य परिस्थिती पाहता येत्या एक-दोन निवडणुकींनंतर मराठ्यांचे वर्चस्व नेस्तनाबूत होईल, असे चित्र दिसते. सध्याची बहुतेक मंडळी पूर्वपुण्याईवर तग धरून आहेत. राज्यातील 33 जिल्हा परिषदांपैकी एक तृतीयांश जागाही मराठ्यांकडे नाहीत. 90 टक्के मराठा जातीची लोकसंख्या असलेल्या गावात 15-20 वर्षे मराठा सरपंच नाही. आमदारांची संख्या आताच 25-30 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी आता मराठ्यांमधील 96 कुळी, पंचकुळी, सप्तकुळी, देशमुख, पाटील, सरदार, राजांनी स्वत:ला कमीपणा वाटून घेण्यात काहीच हरकत नाही. लाजही वाटायचे काही कारण नाही. आपल्या समाजाच्या हितासाठी, आपल्याच तळागाळातील गोरगरीब बांधवांसाठी आरक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला लाज वाटत असेल, संकोच वाटत असेल तर निदान गप्प बसा, जी मराठा समन्वय समिती व इतर मराठा संघटना संघर्ष करीत आहे त्यांच्यामध्ये "खो' तरी घालू नका, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. आज संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारनेही नमते घेतले आहे. मग काही मूठभर मराठ्यांचा विरोध का? तुम्ही गप्प बसावं, हेच शहाणपणाचं ठरेल, अन्यथा संतप्त मराठ्यांकडून तुम्हाला चांगलाच धडा शिकवला जाईल, ही आमची पोकळ धमकी नव्हे, कारण पाणी डोक्यावरून जायला लागले आहे. तेव्हा गप्प राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे, आणि हाच तुमच्यासाठी मोलाचा सल्ला आहे.

Thursday, January 1, 2009

नवे वर्ष-नवे प्रकल्प-नवे संकल्प

नववर्षाचे स्वागत करताना तुमच्या मनात नक्की काही नवे निश्र्चय करण्याचा विचार तरंगत असणार.हे नवे वर्ष सुखाचे, समृद्धीचे, यशाचे, ध्येयपूर्तीचे जावो अशा शुभेच्छा तुम्हाला देत असतानाच आम्ही तुम्हाला कोणते निश्र्चय तुम्ही स्वत:शी करावेत याबाबत मार्गदर्शक टिप्स देतो आहोत. हे इथे सूचिबद्ध केलेले सर्वच्या सर्व निश्र्चय तुम्ही कराल, पाळाल असे नाही, पण जेवढे जास्त निश्र्चय कराल आणि अंमलात आणाल तेवढी तुमची अधिक स्वप्ने साकार होतील हे मात्र नक्की. तर मग ही घ्या "निश्र्चय सूची' नववर्षाच्या शुभेच्छांसह!
* रोज किमान एक वृत्तपत्र आणि पुस्तकांची 25 पाने वाचीन.
* रोजच्या रोज दैनंदिनी लिहून दिवसभरातील घटनांची आणि चुकांची अंतर्मुख होऊन नोंद करीन, उद्या स्वत:च्या विकासासाठी काय करणार त्यापैकी एका मुद्दयाची, कृतीची नोंद करीन.
* मी "पॉझीटीव्ह थिंकींग' करीन निगेटीव्ह विचार, भावना आणि व्यक्तींना थारा देणार नाही.
* मी सर्व अपॉइंटमेंटस्‌, वेळा आणि दिलेले शब्द सबबी न सांगता पाळीन, जी पुरी करण्याची माझी इच्छा, क्षमता नाही अशी आश्र्वासने मी कुणालाही देणार नाही.
* इतरांनी ज्याप्रकारे मला मदत करावी असे वाटते तशी मदत मी पुढाकार घेऊन इतरांना करीन.
* माझ्या चुका मी कबूल करीन आणि सुधारीन.
* मी माझे आणि माझ्याभोवतीच्या लोकांचे मन प्रसन्न ठेवीन.
* दुसऱ्यांमध्ये मी चांगले गुण शोधीन, दोष, उणीवा, चुका शोधून पूर्वग्रहाने कुणाशी वागणार नाही.
* माझ्या जबाबदाऱ्या मी स्वीकारून वेळेवर पार पाडीन.
* कुठलीही गोष्ट फुकट घेणार नाही.
* रोज 15 मिनिटे व्यायाम, योगासने, ध्यान करीन.
* भाषण, संभाषण कौशल्य जाणीवपूर्वक विकसीत करीन, दुसरा नाराज, नाऊमेद होईल असे बोलणार नाही.
* भीती, शंका, संशय, मत्सर, द्वेष याला थारा देणार नाही.
* मित्र, नातेवाईकांशी समक्ष भेटी, फोन, एस.एम.एस. द्वारा सतत संपर्कात राहून संबंध वाढवीन.
* लोकांना जाणीवपूर्वक खुश करण्यासाठी चांगले वागेन, बोलेन, त्यांची स्तुती, प्रशंसा करीन व आपला ग्रुप बांधीन.
* दर महिन्याला किमान 1 मराठी नाटक किंवा चित्रपट पाहीन, 1 पुस्तक वाचून पूर्ण करीन.
* मातापित्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करीन.
* मुलांना स्वातंत्र्य देऊन व्यक्तिमत्वविकासासाठी संधी, प्रशिक्षण, संस्कार देईन.
* आठवड्यातील किमान 1 तास माझ्या छंदासाठी देईन.
* आठवड्यातून 2 तास माझा स्वार्थ नसलेल्या समाजकार्यासाठी देईन.
* आळशीपणा, वेळ वाया घालवणे, चकाट्या, रिकामटेकड्या गप्पा, व्यसनात वेळ वाया घालवणार नाही.
* मी चुगल्या करणार नाही, हलक्या कानाने कुणाचे ऐकून कुणाबद्दल माझी मते बनवणार, बदलणार नाही.
* शिव्या देणार नाही, अपशब्द संभाषणात वापरणार नाही.
* रोज एका तरी व्यक्तीला प्रसंगोचित शुभेच्छा देईन.
* रोज 1 तास कुटुंबीयांना देईन.
* रोज 1 जेवण किंवा नाश्ता टी.व्ही.न लावता एकत्र कुटुंबाबरोबर घेईन.
* दर दोन महिन्यातून एखाद्या सुट्टीला कुटुंबासह सहलीला जाईन.
* माझ्या देव-दैवत-साधुपुरुषाच्या ध्यान-पूजेत रोज 10 मिनिटे व्यतित करीन.
* दर सहा महिन्यांनी रक्त इ. आरोग्य तपासणी करून घेईन.
* वर्षभरात एकदाही अपचन होईल एवढे खाणार नाही.
* मी आवश्यक त्या रक्कमेचा माझा विमा उतरवीन.
* निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी आत्तापासून गुंतवणूक करीन.
* नियमित बचत करीन.
* नियमित कर्जफेड करीन.
* अकारण फोन, मोबाईल गरजेपेक्षा जास्त वापरणार नाही.
* उत्तम श्रोता बनेन, लोकांचे ऐकून घेईन, कमी बोलेन.
* माझ्या चुकीची क्षमा मांगेन, दुसऱ्याला क्षमा करेन.
* नेहमी हसतमुख राहीन.
* कंजुष क्षुद्रवृत्तीने वागणार नाही.
* खरा मित्र बनेन, खरे मित्र जोडून, सांभाळेन.
* दिलेले, सोपवलेले काम निष्ठेने विचारपूर्वक करीन.
* कार्यालयातील प्रश्र्न घरी व घरचे प्रश्र्न कार्यालयात "नेणार' नाही.
* आकर्षक दिसण्यासाठी पोषाख, चष्मा, मेकअप्‌, बॉडी लॅंग्वेज, पर्सनॅलीटीची काळजी घेईन.
* अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुणाला भेटणार नाही.
* मी, माझे, मला ऐवजी आपले, आपण बोलेन.
* लोकांशी स्वत:विषयी न बोलता त्यांच्या विषयी बोलेन.
* लोकांना ते कुणीतरी खास व्ही.आय.पी.आहेत अशी वागणूक देईन.
* लहानसहान गोष्टींकरिता न चुकता लोकांना धन्यवाद देईन.
* लोकांची नावे, जन्मतारखा लक्षात ठेवीन.
* वादाचे मुद्दे टाळीन, भांडणे करणार नाही.
* चांगले बोलता आले नाही तरी वाईट बोलणार नाही.
* प्रामाणिकपणे उदारपणे लोकांचे कौतुक करीन.
* दरमहा काहीतरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी जोड व्यवसाय करीन.
* हॉटेलमध्ये कमीतकमी खर्च करीन/ जाईन.
* शक्य तेव्हा स्वत:च्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनाने प्रवास करीन.
* लग्न, समारंभांवर उधळपट्टीने खर्च करणार नाही.
* बढाया, थापा, गमजा, वल्गना करणार नाही.
* रोज मॉर्निंग वॉकला जाईन.
* मी आजचे काम उद्यावर ढकलणार नाही.
* मी पाणी, वीज, पेट्रोल वाया घालवणार नाही.
* मी एखादे तरी झाड लावून जगवीन.
* मी कोणत्यातरी संस्था, संघटनेचा सदस्य म्हणून सक्रीय सामाजिक, सांस्कृतिक काम करीन.
* पूर्वतयारी शिवाय मी कोणतीही गोष्ट करणार नाही.
* आयुष्य ही एक महत्त्वाकांक्षा समजून पूर्ण करीन.
* आयुष्य हे एक साहस समजून मी धाडस करीन.
* आयुष्य हे एक कार्य समजून ते तडीस नेईन.
* आयुष्य हा एक संग्राम आहे असे समजून लढेन.
* आयुष्य ही सुंदर गोष्ट आहे असे समजून उपभोग घेईन.
* आयुष्य हे एक आव्हान समजून त्याला सामोरा जाईन.
* आयुष्य हे एक कर्तव्य समजून ते पूर्ण करीन.
* आयुष्य हा एक डाव आहे असे समजून तो खेळेन.
* आयुष्य हा एक जुगार आहे असे समजून तो जिंकेन.
* आयुष्य हे एक बक्षीस आहे असे समजून स्वीकारेन.
* आयुष्य हे एक ध्येय आहे असे समजून साध्य करीन.
* आयुष्य ही एक जोखीम समजून स्वीकारेन.
* आयुष्य हा एक प्रवास आहे असे समजून चालत राहीन.
* आयुष्य हा एक ऐषाराम आहे असे समजून आनंद घेईन.
* आयुष्य हे एक रहस्य आहे समजून उलगडण्याचा प्रयत्न करीन.
* आयुष्य ही एक सुसंधी आहे समजून फायदा घेईन.
* आयुष्य हा प्रश्र्न समजून त्याचे उत्तर मिळवीन.
* आयुष्य हे एक वचन आहे असे समजून ते पूर्ण करीन.
* कोणता तरी खेळ खेळून त्यात प्राविण्य मिळवीन.
* निर्णय घेण्यापूर्वी विचार करीन, निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहीन.
* मी कुटुंबाला विश्र्वासपात्र वाटेन असे वागेन.
* मी श्रीमंत होईन.
* मी अंधश्रद्धा सोडीन, डोळसश्रद्धा ठेवीन.
* मी बुवाबाजी, तंत्रमंत्र, जादूटोण्यामागे लागणार नाही.
* मी चुकून शरीराने आजारी पडलो तरी मनाने रोगट होणार नाही.
* मी आहारात पालेभाज्या, फळे, कडधान्ये खाईन.
* तळलेले पदार्थ, मसालेदार, अतिगोड पदार्थ टाळीन.
* आहारातील साखर, मीठ कमी करीन.
* वाजवीपेक्षा जास्त झोपणार नाही, जागरणे करणार नाही.
* दिवसाला 12/15 ग्लास पाणी पिईन.
* आवश्यक तेवढी विश्रांती घेईन.
* उंचीच्या प्रमाणात आदर्श वजन ठेवीन.
* आठवड्यातून एकदा तरी उपवासाचे पदार्थही न खाता लंघन-उपास करीन.
* रोज रात्री झोपण्यापूर्वी स्नान करीन.
* एखाद्या जिवंत व्यक्तीला गुरू मानून त्यांचा सल्ला वेळोवेळी घेईन.
* अकारण आक्रमक, आक्रस्ताळेपणाने वागणार नाही, नेहमीच सौजन्याने, साभ्यतेने वागेन.
* मी भूतकाळातील चुका मान्य करीन, पण त्यासाठी पश्र्चात्ताप करीत, न्यूनगंडाने वागणार नाही.
* लहान प्रश्र्नांचा मी मोठा बाऊ करणार नाही.
* मी माझ्या कामात इतरांना सहभागी करून घेईन.
* मी तणावमुक्त राहण्याची सवय मनाला लावीन.
* मी नाही म्हणायला शिकेन, कुणाच्या नाहक दबावाखाली हो म्हणणार नाही.
* मी रोज सकाळी आजच्या कामांची यादी करून रात्री त्यांचा जमाखर्च मांडेन.
* मी परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही तरी मन:स्थिती काबूत ठेवीन.
* मी कॉम्प्युटर, इ-मेल, वेबसाईट यांचा वापर करून माझे माहिती व जनसंपर्क वाढवीन.
* मी सर्वांच्या नजरेत भरण्यासाठी दक्ष राहीन पण कुणाच्याही नजरेत खुपणार नाही याचीही काळजी घेईन.
* मी लोकप्रिय व्यक्ती बनण्याचा माझ्याशी संपर्क-संबंध येणाऱ्या वर्तुळात प्रयत्न करीन.
* मी दरमहा एकातरी महत्त्वाच्या व्यक्तीची ओळख करून संपर्कात राहीन.
* मी महिन्यातून एकदा तरी माझ्या देव-दैवताच्या देवळात जाऊन प्रार्थना करीन.
* मी पुढच्या 31 डिसेंबर 2009 पर्यंत आज आहे त्यापेक्षा अधिक यशस्वी असेन!